मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

शनिवार, 14 फ़रवरी 2009

पृथ्वीच्या पोटातला कार्बन काढू या नको. -08

पृथ्वीच्या पोटातला कार्बन काढू या नको.
लीना मेंहदळे
leena.mehendale@gmail.com
published in Lokmat on 21 Feb 2009
कांही वर्षापूर्वी आपल्याकडे त्सुनामी लाट आली, नंतर अमेरिकेमध्ये कतरिनाची तुफानी लाट आली. हे आपल्याला काय संकेत देतात ? दोन वर्षापूर्वी गुजरात, नंतर बिहार व मध्यप्रदेश मग लगेच मुंबई, महाराष्ट्र व कर्नाटक आणि मध्यप्रदेश ही सतत पूरजन्य परिस्थितीत होती. या सर्व घटना कोणत्या नैसर्गिक कारणांना जोडलेल्या आहेत ? यावर विचार करण्याची जबाबदारी आज सर्वांची आहे, मग ती सामान्य माणसं असोत की सरकार असो..
मनुष्य हा निरंतर विकास करणारा प्राणी आहे. प्रगती आणि विकासासाठी पृथ्वी, अंतराळासहित सर्व महाभूतांवर विजय मिळविण्याची मानवाची क्षमता आहे. परंतु अंधाधुंद विजय मिळविण्याने उन्नती होत नाही. यश पचविणे, त्याला आत्मसात करणे आणि त्यातून चिरस्थायी प्रगतीची घडी कशी बसेल हे पाहाणे महत्वाचे आहे. मनुष्याने निसर्गावर विजय मिळविला असेल देखील, पण जर तो आत्मसात करुन निसर्गाबरोबर सामंजस्य ठेवले नाही तर निसर्ग सुध्दा बदला घेतल्याशिवाय राहात नाही, हेच वरील घटना दाखवितात.
दोन तीनशे वर्षापूर्वी पासूनच्या इतिहासात जागतिक तापमानाचा ग्राफ खालून वर असा होता. याचा अर्थ असा की पृथ्वीवर वायुमंडळाचे तापमान वाढतच राहिले आहे. परंतु त्यातल्या त्यांत मागील शंभर वर्षात तपमानात खूपच वाढ झाली आहे. या तापमानाच्या वाढीचे परिणाम त्सुनामी, कतरिनाच्या स्वरुपात दिसू लागते. तसेच कित्येक राज्याने पूरस्थिती देखील सोसली आहे त्याचेही कारण हेच. पण तापमान का वाढते ? याचे कारण समजणे खूप सोपे आहे.
पृथ्वीच्या पोटामध्ये खूप प्रमाणात कार्बन आहे आणी पृष्ठभागवर पण आहे.. संपूर्ण जीवसृष्टीचा आधारच कार्बन आहे. हा कार्बन ज्वलनशील आहे. ऑक्सीजनमध्ये कार्बनचे ज्वलन झाल्यावर कार्बन डायऑक्साईड बनतो, आणि या प्रक्रियेतूनच उष्णता बाहेर पडते. ती जर आपण पकडू शकलो तर तिचा उपयोग इंधन किंवा विजेसाठी करु शकतो. आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी इंधन हे महत्वाचे आहे. उदा. कोळसा, लाकडे, स्वयपांकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल, फ्युएल ऑईल आणि रॉकेल या सर्व इंधनात कार्बनचे मोठे प्रमाण असते,
पृथ्वीवर जो कांही कार्बन आहे, त्याचे आपले एक चक्र बनलेले आहे. जेव्हा कार्बन जळतो, तेव्हा तो कार्बन डायऑक्साइड बनतो आणि वातावरणात सामावून जातो. तेथूनच मग वृक्ष आपल्या श्वासाबरोबर त्याला आत घेतात आणि उन्हाच्या मदतीने कार्बन व ऑक्सीजन वेगवेगळे करतात. तो ऑक्सीजन पुन्हा वातावरणात सोडला जातो, आणि आपल्याला श्वासासाठी शुध्द हवा मिळते. कार्बन हा घन पदार्थाच्या रुपाने झाडांची पाने, फुले व बीयांमध्ये राहतो. या सर्व वनस्पतीजन्य गोष्टींना इतर जीवसृष्टी खाते आणि तो कार्बन त्यांच्या शरीराचा एक हिस्सा बनतो. ते प्राणी मेल्यावर त्यांचे र्निजीव शरीर जेव्हां सडेल, गळून पडेल किंवा जळेल तेव्हां त्यातून कार्बन डायऑक्साईड निघून हवेत मिसळेल, मग ते जीव-जन्तु असोत, झाडे-झुडपे असोत किंवा मानव प्राणी असो. किंवा त्यातील कांही कार्बन डायऑक्साइड मातीमध्ये मिळून जातो, आणि खनिजांच्या कार्बोनेटच्या स्वरुपात तेथे राहतो. जेव्हा आपण खनिज पदार्थांपासून धातू निर्माण करतो जसे लोखंड, तांबे, अल्युमिनियम इत्यादी, तेव्हा त्यांच्याबरोबर असलेला कार्बन डायऑक्साइड बाहेर पडून हवेमध्ये परत जातो.
अशाप्रकारे वातावरणातून झाडांमध्ये, तेथून प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये आणि तेथून कार्बोनेटच्या रुपात मातीमध्ये कार्बन परत येतो. किंवा झाडं किंवा प्राणांचे शरीर सडून गेल्यावर परत कार्बन डायऑक्साइडच्या रुपात वातावरणात मिसळतो. अशाप्रकारे कार्बनचे चक्र चालू रहाते.
सूर्याच्या किरणांनी पृथ्वीवर उष्णता येते. त्यासाठी कार्बन डायऑक्साइड एकप्रकारे दरवाजाचे (संरक्षणाचे) काम करते. सूर्य किरणांपासून मिळणारी उष्णता पृथ्वीच्या आवरणातील अनेक अडथळे पार करुन पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचते. परंतु हीच उर्जा रात्री अवरक्त किरणांच्या (Infra Red Rays) रुपात पुन्हा पृथ्वीच्या वातारणाच्या बाहेर जाऊ पहात असेल तर कार्बन डायऑक्साइडचा थर तिला मोठ्या प्रमाणांत अडवू शकतो.
ज्या दिवशी वातावरणांत कार्बन डायऑक्साइडची पातळी कमी असेल, तेव्हां तो उष्णतेला बाहेर जाऊ देतो आणि त्यामुळे वातावरणाचे तपमान वाढत नाही. काच पण अशाच प्रकारे दरवाजाचे काम करते. म्हणून तिचा उपयोग ग्रीन हाऊसमध्ये केला जातो. तेथे तो गुण लाभदायक आहे. परंतु जेव्हां कार्बन डायऑक्साइड वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढतो, तेव्हां जागतिक तपमानात वाढ होते, व त्यामुळे पर्वतावर जमा झालेला बर्फ वितळायला लागतो. त्यामुळे पूर व तुफानासारखी परिस्थिती निर्माण होते.
यावरुन हेही महत्वाचे लक्षांत येते की, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या बाहेर जो कार्बन आहे, त्याची कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन अशी वाटणी आहे, त्या दोन्ही मध्ये संतुलन राहते. कार्बन डायऑक्साइडला वृक्षांनी शोषून घेतले तर वातारणातील तपमानांत वरचेवर वाढ होणार नाही. अशाप्रकारे झाडं-झुडपांच्या सहाय्याने कार्बन चक्राचे संतुलन व्यवस्थित राहते.
मग आता वेळ कशाला दवडायचा ? चला तर आपणही वृक्षारोपण करु या.
-------------------------------------------------------------------------

सुंदर नक्षत्र -- मृगशिरा -07

सुंदर नक्षत्र मृगशिरा  (हिंदी -- आओ बच्चों -- अलग से)
Published in Lokmat, dt 14 Feb 2009
संक्रांत संपून वसंत ऋतु आलेला आहे, दिवस मोठा होऊ लागलेला आहे. सूर्यास्ताच्या तासाभरानंतर पूर्वेकडे बघितले तर आकाशात सगळयात सुंदर आणि मोठया तारकांनी भरलेले मृगशिरा नक्षत्र आपण लगेच ओळखू शकतो.

आकाशात कधीही चांदण्या बघताना आपल्याला प्रश्न पडतो, की यांची नांवं काय आहेत? कोण कोण आहेत या चांदण्या? आकाशातील सगळयात मोठया चार चांदण्या शुक्र, गुरु, व्याध व अभिजित या आहेत. सध्या सुर्यास्तानंतर पश्चिमेकडे मोठी शुक्राची चांदणी आणि पूर्वेकडे मोठी व्याधाची चांदणी दिसते. त्यांना ओळखायची खूण म्हणजे त्यांचा मोठा आकार होय.
मृगशिरा नक्षत्राला इंग्रजित ‘ओरायन’ असे म्हणतात. हे नक्षत्र आकाशात विस्तीर्ण पसरलेले आहे. याच्या मध्य भागी एक सारख्या चकाकणार्‍या तीन चांदण्या असतात. त्या एका सरळ रेषेत असतात म्हणून त्यांना त्रिकांड असे म्हणतात. त्यांच्यामुळेच ग्रामिण भागात या नक्षत्राला ‘तीन काडयांचे नक्षत्र’ असे म्हणतात.


चित्रात दाखविल्याप्रमाणे त्रिकांडाच्या सरळ रेषेतच डाव्या बाजूला (दक्षिणेकडे) व्याधाची मोठी चांदणी असते तर उजव्या बाजूला (उत्तरेकडे) रोहीणी नक्षत्राची लालसर चांदणी असते. व्याध, त्रिकांड आणि रोहिणी या पाच चांदण्या जवळपास एका सरळ रेषेत आहेत. यातील व्याधाची चांदणी खूप मोठी असतेच मात्र रोहिणीचा आकारही त्रिकांडाच्या चांदण्यापेक्षा मोठा आहे.
त्रिकांडाच्या थोडया खालच्या बाजूला त्रिकांडाशी सुमारे 30 अंशाचा कोन करीत, एका सरळ रेषेत अजून तीन चांदण्या दिसतात. मात्र या तीन चांदण्यानी आभा कमी-कमी होत गेलेली दिसते.
त्रिकांडांच्या चारी बाजूला साधारणपणे आयाताकृतीमध्ये आणखी चार चांदण्या आहेत, त्या चारही चांदण्याची आभा त्रिकांडातील चांदण्यापेक्षा जास्त परंतु व्याधाची चांदणीपेक्षा कमी व सुमारे रोहीणीच्या चांदणी इतकी असते. या चार आयाताकृती चांदण्यांमुळे मृगशिरा नक्षत्राला ग्रामीण भागात ‘खाटबाजल’ असे नांवही पडलेले आहे. या संपूर्ण विस्तारामुळेच मृग हे आकाशातलं महत्त्वाचं आणि सुंदर नक्षत्र आहे. इतके की सागरी वाहतूकीसाठी दिशा ओळखण्यासाठी सर्व नाविकांना याचा मोठा आधार आहे.
चित्रात दाखविल्याप्रमाणे मृगशिरातील या 10 चांदण्यांच्या थोडे वर समांतर चतुर्भूज आकृतीत पुनर्वसु नक्षत्राच्या चार चांदण्या दिसतात. त्यातील उजवी कडील खालच्या चांदणीची आभा खूप मंद असते. पण हा सुंदर समानान्तर चतुर्भूज ओळखून काढायला पुरेशी असते. या चार चांदण्या मिळून पुनर्वसु नक्षत्र बनते.
मृगशिरा या शब्दाचा अर्थ हरणाचे डोके. भारतीय पौराणिक कथांमध्ये अशी कथा आहे की, एका दृष्ट राक्षसाने रोहीणी नांवाच्या अप्सरेला त्रास देण्यासाठी हरणाचे रुप घेऊन तिच्यावर चाल केली, त्यावेळी विष्णूने व्याध म्हणजेच शिका-याचे रुप धारण करुन तीक्ष्ण बाण सोडला. तो त्या हरणाच्या पोटात रुतला, हे बाण म्हणजे त्रिकांडाच्या तीन चांदण्या आहेत. म्हणून व्याध, त्रिकांड, आणि रोहीणी एका सरळ रेषेत दिसतात. त्रिकांडाच्या खालच्या बाजूस तीन छोटया चांदण्या म्हणजेच हरिणांच्या शरीरातून ओघळलेले रक्ताचे थेंब. त्रिकांडाच्या सभोवताली जे चार आयताकृतीे तारे आहेत ते म्हणजे हरीणीचे शरीर. आयाताकृतीच्या आत इतरही बर्‍याच छोटया, छोटया चांदण्या आहेत त्या म्हणजे हरीणाच्या शरीरावरील ठिपके. त्या चित्रात दाखविलेल्या नाहीत.
परंतु ग्रीक पौराणिक कथेमध्ये मृगशिराचे नांव ‘ओरायन’ असे आहे. ग्रीक कथेनुसार ओरायन हा एक जबरदस्त शिकारी होता. तो आपल्या कंबरेला तीन हिरे जडवलेला पट्टा बांधत असे, या पट्टयाच्या खालच्या बाजूला त्याचे खंजीर लटकत असे व त्यावरही तीन हिरे जडलेले असत. ओरायनच्या पट्टयातील तीन चमकणारे हिरे म्हणजेच त्रिकांडाच्या तीन चांदण्या होय.ज्या चांदण्याना आपण व्याध म्हणजेच शिकारी असे म्हणतो त्याचे ग्रीक कथेतील नाव ‘सिरीयस’ असे असून तो ओरायनाचा शिकारी कुत्रा होता. खगोल शास्त्रात याला केनिस मेजर असे म्हणतात. या चांदणी जवळच ‘केनिस मायनर’ या नांवाची छोटी चांदणी पण दिसते जी ग्रीक कथेनुसार ओरायनचा छोटा कुत्रा आहे.
आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळ जे तीन तारे आहेत ते क्रमश: सुर्य, अल्फा सॅटॉरी व व्याध हे आहेत. यामुळे भविष्यकाळातील अंतरीक्ष विज्ञानासाठी व्याधाची चांदणी महत्वाची आहे.
येत्या महिन्याभरात सुर्यास्तानंतर थोडया वेळात मृगशिरा नक्षत्र, पूर्व दक्षिण क्षितीजावर दिसू लागेल. या नक्षत्राचा रात्रभराचा प्रवास पूर्वेकडून हळू हळू पुढे जात पहाटेच्या सुमारास पार पश्चिम-दक्षिण क्षितीजावर त्याचा अस्त होतो. रात्री वेगवेगळया वेळी अधून मधुन उठून आकाशाकडे दृष्टी टाकली तर या सुंदर नक्षत्राची आपल्याला ओळख पटेल व ते आकाशात कसे फिरत आहे ते आपल्याला कळेल. इतर नक्षत्रांबाबत शिकतांना मृग नक्षत्राची ओळख खूप उपयोगी ठरते.
-------------------------------------------------------------------------------------

शनिवार, 7 फ़रवरी 2009

चला बनवा आपापल्या माहितीचा ढग -06

संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक.संगणक म्हणजे माहीतीचा खजिना
published in Lokmat on 7 Feb 2009
संगणकावर इंटरनेटव्दारे जगभर फाईली पाठविण्याचा शोध १९९५ मध्ये लागला. त्याच्या खूप आधी म्हणजे 1885 च्या आसपास जगदीशचंद्र बोस व मार्कोनी या वैज्ञानिकांनी रेडियो तरंगांच्या सहाय्याने एका जागेवरुन दुसरीकडे आवाज किंवा संदेश पोचवण्याचं तंत्र शोधल होतं. त्यातूनच पुढे रेडियोचा जन्म झाला. रेडियोसाठी प्रसारण करणा-या आकाशवाणी केंद्रांवरुन तिथले कार्यक्रम रेडियो तरंगाच्या सहाय्याने अवकाशात पाठवतात. त्याचवेळी आपण आपला ट्रान्झिन्टर ट्यून केला असेल तर तो या रेडियो तरंगांना पकडतो, आणि मूळ केंद्रावर चालणारा कार्यक्रम आपल्याला जसाच्या तसा ऐकवतो. पण तो क्षण निघून गेल्यावर आपण तो कार्यक्रम ऐकू शकत नाही. म्हणूनच आकाशवाणी केंद्रावर सहा वाजता लागणारा कार्यक्रम आपण सात वाजता ऐकू शकत नाही. याला रियल टाइम किंवा ऑन-लाईन अप्रोच म्हणजे “ज्या च्या त्या क्षणाला” असे नांव आहे. (हुषार लोकांनी त्यावर तोडगा काढलाच- की सहा वाजता लागलेला कार्यक्रम कुणाला तरी रेकॉर्ड करुन ठेवायला सांगायचे आणि मग तो सावकाश ऐकायचा.)
तसेच या पध्दतीला “ब्रॉडकास्ट पध्दत” असे नांव आहे. कारण केंद्रावरील ट्रान्समिशन ताबडतोब दाहीदिशात पसरते आणि कुणीही ते ऐकू शकतो. सर्वांसाठी खुले!
पण त्याही खूप आधी म्हणजे 1876 मधे अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell) ने टेलिफोनचा शोध लावला. त्यामध्ये एका यंत्रावर बोललेले स्वर लगेच इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये बदलतात, आणि टेलिफोनच्या तारेतून दुस-या टोकाला किंवा लांबच्या गावांला पोचतात. तिथल्या रिसीव्हर मध्ये ते पुनः स्वरांच्या रुपाने तिकडच्या माणसाला ऐकू येतात. हे देखील ऑन-लाईनच असते.
यात महत्वाचा मुद्दा असा की फोनवरील संदेश-वहन एका विशिष्ट फोन नंबर वरुन दुस-या विशिष्ट फोन नंबरवरच जाऊ शकते - ते सर्वाना खुले नसते. त्यांना पाठवणा-याचा पत्ता (महणजे फोन नंबर) आणि ज्याला पाठवावयाचे त्याचा पण फोन नंबर सांगावा लागतो. याला point to point संदेशवहन म्हणतात.
फोनचे संदेशवहन जगभर जाणे गरजेचे असल्याने गेल्या शंभर सव्वाशे वर्षांत समुद्रातून, जमीनीखालून, जमीनीवरुन असे तारांचे जाळेच जगभर विणले गेले. त्यासाठी अल्युमिनियमच्या तारा, तांब्याच्या तारा यासोबत काचेच्या तारा - ऑप्टिक फायबरचा वापर करण्यात आला. ऑप्टिक फायबरची क्षमता इतर तारांपैकी कितीतरी पट अधिक असते. असे तारांचे जाळे विणणा-या कंपन्या जगांतील अति श्रीमंतांच्या यादीत असतात. संगणकासाठी देखील याच तारा वापरल्या जातात.
यावरुन आपल्या लक्षांत येईल की, सुरुवातीच्या काळापासून संदेश पाठविणा-या दोन त-हा विकसित झाल्या. एका विशिष्ट पत्त्यावरुन दुस-या पत्त्यावर संदेश पाठविणे- जो फक्त त्याच व्यक्तीला घेता येईल अशी एक पद्धत. फार पूर्वीची टपाल खात्याने पत्र पाठविण्याची पध्दत याच प्रकारची होती हे तुमच्या लक्षात आले असेलच. मात्र टपालाला पोचायला वेळ लागतो ही गैरसोय तर येणारे पत्र हे ऑफ-लाइन म्हणजे ज्याला मिळाले त्याने त्याच्या सोयीने कितीही उशीर करुन वाचावे असे असते, ही मोठी सोय.
दुसरी त-हा म्हणजे ब्रॉडकास्ट मेथडने एकाचवेळी कोण्या एका संपूर्ण क्षेत्रात ऐकता येईल अशा पद्धतीने ब्रॉडकास्ट करणे. रेडियो किंवा दूरदर्शनवरुन येणारे संदेश ब्रॉडकास्ट पद्धतीचे म्हणजे कुणीही ऐकावे असे असतात पण ऑन लाइन म्हणजे ज्या क्षणी ते पोहोचतात त्याच क्षणी ऐकावे लागतात.
संगणकात या दोन्ही सोयीचा मेळ घातलेला आहे. जाणारी ई-मेल टेलिफोनच्या तारांमधून जात असल्याने ट्रॅफिक जाम नसेल तर लगेच पोहोचते. ती point to point पध्दतीची असते, म्हणजे ज्याच्या पत्त्यावर ई-मेल पाठविली त्यालाच ती मिळते, मात्र सोयीने केव्हांही वाचता येते.
ई-मेल चा प्रवास बव्हंशी तारेतून, क्वचित थोडे अंतर रेडिओ तरंगाच्या माध्यमातून व कधीकधी सेटेलाइट च्या माध्यमातून होतो. मोबाईल चे संदेशगमन देखील point to point असते. मात्र टेलिव्हजनचे संदेशगमन ब्रॉडकास्ट पध्दतीने असते.
संगणक म्हणजे माहीतीचा खजिना कसा बनतो ते पाहू या. ई-मेल चे संदेश-वहन point to point असले तरी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन गूगल, याहू सारख्या कंपन्यांनी अशी सुविधा निर्माण केली ज्याव्दारे आपण अवकाशांत आपल्या स्व:तचा एक माहितीचा ढग तयार करु शकतो आणि या ढगाचा देखील एक पत्ता असतो. जो हा पत्ता गाठील त्याला तिथे लिहीलेली माहिती वाचता येते किंवा इतरही बरीच कामे करता येतात चित्र, व्हिडियो अशा सर्व प्रकारची माहिती आपल्या ढगावर ठेवता येते. या ढगांमधे सगणकाच्या भाषेत वेब साईट, ब्लॉग साईट किंवा पोर्टल असे प्रकार आहेत. गूगल, याहू यांचे स्वत:चे असे ढग तर आहेत. शिवाय ते इतरांच्या ढगांचे प्रबंधन पण करतात. त्यामुळे त्यांना सर्वांचे सर्व ढग- व त्यातील माहिती पहाता येते. यासाठी त्यांनी स्वत:ची सर्च इंजिन्स तयार केली. म्हणून जर कोणी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाईप केला तर ज्या ज्या ढगांवर, ज्या ज्या माहीतीत भारत हा शब्द आला असेल त्या सर्व पानांची एक यादीच आपल्या समोर ठेवली जाते. आजच मी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाइप केल्यावर संगणकाने माहिती दिली की सर्व माहिती ढगांवर मिळून एकूण एक कोटी दोन लाख पानांवर भारत हा शब्द आढळतो व ती यादी शोधून माझ्या समोर ठेवायला गूगलला फक्त 0.21 सेकंद लागले.
यावरुन आपल्याला कळेल की. संगणक उघडून त्यावर इंटरनेट सुरु करुन गूगल सर्च उघडले तर माहितीचं एक अफाट जग आपल्या समोर उघडत. त्यात वृत्तपत्रातील माहितीपण असते. कित्येक लेखक आपले संबंध पुस्तकच्या पुस्तक स्वतःच्या माहिती- ढगांवर टाकून ठेवतात. ते आपण वाचू शकतो. प्रश्न विचारु शकतो. मित्रमंडळ स्थापन करु शकतो.
तर मग चला आणि तयार करा आपापले माहितीचे ढग आणि कळू द्या जगभराला तुमचे विचार.
-- लीना मेहेंदळे, leenameh@yahoo.com
----------------------------------------------------

गुरुवार, 22 जनवरी 2009

Table of Nine -- देखिए यह वीडियो

नौ के पहाडे की लम्बी कहानी हमने जो सीखी सुनो, जरा संभल के करना हिसाब प्यारों, मिलेंगे नौ के नौ.. Klik here
अर्थात्
नवाच्या पाढ्याची गंमत जंमत
अर्थात्
अन्य भारतीय भाषाओं में भी
देखिए यह वीडियो
और समझिये कितना सरल है
जी हाँ गणित।

शुक्रवार, 16 जनवरी 2009

पांढरी फुले -05

पांढरी फुले
published in Lokmat on 31 jan 2009
लहानपणी आम्ही भेंडयांसारखाच पण थोडा वेगळा एक खेळ खेळत असू. दोन पार्ट्या. त्यांनी एकापाठोपाठ एक धडाधड फुलांची नांव सांगायची. जी पार्टी अं, अं, करेल म्हणजे पटकन नांव सांगू शकणार नाही, त्या पार्टीवर भेंडी. खेळ लवकर संपवायचा नसेल तर नांव आठवण्यासाठी घड्याळ लावून 1 किंवा २ मिनिट वेळ द्यायचा. याच खेळाचा थोडा वेगळा प्रकार असा कि दोन्ही गटांनी एका ठरावित ठेळेत पाटीवर नांवे लिहून काढायची- त्यांत पुनः रंग पण ठरवून दिले जायचे- कधी फक्त लाल फुलं, कधी पांढरी फुलं - कधी वासाची तर कधी बिनवासाची फुलं, वगैरे. या खेळामुळे आमच सृष्टिज्ञान खूपच वाढल आणी सृष्टिप्रेम पण.
असा खूप फुलांचा विचार केला की एक गोष्ट पटकन लक्षात येते. साधारणपणे भारतीय फुलं पांढरी आणी सुवासिक असतात तर रंगीत फुल कमी वासाची. विशेषतः विदेशातून आपल्याकडे आणून लावलेली खूपशी रंगीत फुल बिनवासाची आहेत पण वासाची कमतरता रंगानी भरून काढली आहे - मग एकाच जातीच फूल आपल्याला विविध रंगात पहायला मिळत.
पांढ-या फुलांच आणी पावसाच पण नात असतं. बहुतेक सर्व पांढरी फुल पावसाळ्यांत फुलू लागतात. कारण पण उघड आहे. पाण्यामुळेच सुवास निर्माण होतो. तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याने जो मातीचा गंध दरवळतो त्याच्या पुढे बाकी सर्व गंध फिक्के पडतात अस मला वाटत.
तरी पण फुलांच्या वासाच महत्व कमी होत नाही. वासाची पांढरी फुलं म्हटल की हटकून पहिल नांव तोंडावर येत ते जाई आणी जुईचं. जुईच फूल लहानखोर - नाजुक, तर जाईच थोडस मोठ. मांडवावर हे वेल चढवून ठेवले तर जवळ जवळ वर्षभर फुलं येत रहातात. त्याही पेक्षा गंमत म्हणजे बागेत झोपाळा बांधायचा, शेजारी हे वेल दोन्ही बाजूला लावायचे आणी झोपाळयाच्या कमानीवरच चढवायचे. किंवा दोन तीन मजली घर असेल, गच्ची असेल, तिथे गच्चीवर वेल चढवायचे. जुईच्याच वासाच आणखीन एक थोड मोठ फूल म्हणजे सायली. कोणी तिला चमेली पण म्हणतात.
ही सगळी फुले पांढरीच! पण शुभ्र पांढर फूल बघायच असेल तर ते म्हणजे कुंदाच फूल. म्हणूनच पांढ-या स्वच्छ दातांना कुंदकळ्यांची उपमा देतात. 'या कुन्देन्दु तुषारहारधवला' सारख्या सरस्वतीच्या श्लोकांत पण धवलपणासाठी कुंदाची उपमा दिली आहे. पण कुंदाचा वास अगदी मंद, जवळून घेतला तरच येतो.
पांच पाकळयांचं चादणीच्या आकाराच एक फूल असतं, - बहुतेक मंदिरांमधे देवाचे हार करण्यासाठी वापरतात. लहानपणापासून माझ्या मनांत चांदणीच्या फुलाच्या मंद वासाच आणी मंदिराच गणित इतक पक्क जमलय की त्या फुलाच्या वासाबरोबरच मला जबलपूरच्या माझ्या शाळेच्या वाटेवरचं कृष्णाचं मंदिर डोळ्यासमोर दिसू लागत.
वासाने घर भरून टाकणार फूल म्हणजे मोगरा. हा पुन्हा कधी एकेरी असेल, तर कधी खूप गच्च पाकळयांचा. मोग-याच्या एका जातीच नाव तर हजारी मोगरा आहे- कारण तो गुच्छा-गुच्छांनी फुलतो.
पांढ-या फुलांवर वेगवेगळया रंगांच्या छटा- आल्या की त्यांचे रंग वेगवेगळे वाटतात. प्रत्येक छटेच आकर्षण वेगळच. पारिजातकाच्या फुलाला केशरी देठ असतं. अत्यंत मधुर वासाच हे फूल भल्या पहाटे दरवळायला सुरवात होते ते सूर्योदयापर्यंत. ज्यांना पहाटे उठता येत नसेल त्यांना यांचा सुगंध कधीच कळणार नाही. आमच्या घरांत शेजारी शेजारीच रातराणी आणी पारिजातकाची झाडं आहेत. रातराणी दरवळण्याची वेळ रात्री आठपासून दोन-तीन पर्यंत - पहाट झाली की मात्र पारिजातकाचं राज्य सुरू होतं.
बुचाचे फूलही असेच, सुंदर, लांबपर्यंत वास दरवळणारे. याला लांब देठ असल्याने बिन दो-यानेच छान गजरा करता येतो. किंवा उथळ बशीत पाणी ठेऊन त्यांत ही फुलं गोलाकार सजवून ठेवली तर दोन दोन दिवस छान वास देत रहातात. याचे झाड खूपखूप उंच असते. आपण फक्त खाली पडलेली फुलेच वेचू शकतो. याची इतर नांवं आहेत – गगनजाई (मराठी), गगनमल्लिका (कन्नड) आकाशनील (हिंदी, बंगाली).
सहा-सात पाकळ्यांचं टपोरं अनंताच फूल कोकणांत खूपच प्रिय. वास तर इतका छान की याला हिंदीत गंधराज आणी ओरिया-बंगालीत सुगंधराजच म्हणतात.
छोट्या बटणाच्या आकाराचं बकुळीचं फूल—याचा छान सडा दिवसभर पडत असतो. लांबपर्यंत याचा मंद सुगंध जातो. आम्ही ही पुलं पुस्तकांत ठेऊन देत असू कारण सुकली तरी या पुलांचा वास कित्येक वर्ष टिकून रहातो.
खूप जणांना लक्षांत येत नाही, पण चैत्रातील पहाटेच्या मंद झुळुकी बरोबर कडुलिंबाच्या फुलांचा वास दरवळतो तो अप्रतिमच. असाच आंब्याच्या मोहोराचा वास, आणी हो, बाभळीचीही एक अशी जात असते जिला छान वासाची बारीक पांढरी फुले येतात.
या यादीत अजूनही कितीतरी फुलांची नांवं राहिली आहेत, उदा. चाफा, कमळ, वगैरे. पाहू या तर, तुमच्या पैकी कोणकोण मला फुलांची माहिती कळवू शकेल.
--------------------------------------------------------























गुरुवार, 15 जनवरी 2009

घोडा क्यों अडा ? -04

घोडा क्यों अडा ?
-- लीना मेहेंदळे
leenameh@yahoo.com
yet to keep on website
published in Lokmat on Saturday 24 jan 2009
अकबर बिरबलाच्या गोष्टींमधे ही एक छानशी गोष्ट आहे. अकबराने आपल्या दरबा-यांना तीन प्रश्नांचं एक कोड टाकल. उत्तर एकाच ओळीत द्यायचे होते. त्याने विचारले -
घोडा क्यों अडा ?
पानी क्यों सडा ?
रोटी क्यों जली ?
नेहमीप्रमाणे बिरबलाने खूप वेळ वाट पाहिली - इतर दरबा-यांना संधी दिली आणि कुणालाच उत्तर येत नाही असं पाहून त्याने कोड्याचं उत्तर तीनचं शब्दात सांगितल - फेरा न था |
फेरा - म्हणजे फिरवणे, उलटणे, गतिशील ठेवणे! घोडा एकाच ठिकाणी बांधून ठेवला, त्याला फिरू दिल नाही तर त्याचे पाय आखडतात, मग गरजेच्या वेळी तो धावू शकत नाही - तो अडतो. पाणी एकाच ठिकाणी साठून राहिले तर सडते - त्यामधे कीडे, डांस, शेवाळ इत्यादी साठतात. खळखळून वाहणारं पाणी शुद्घ होत रहातं. तव्यावरची पोळी उलटली नाही तर जळते. या सर्व समस्यांच उत्तर एकच - त्यांना हलत-फिरत ठेवण, वेळच्या वेळी उलटण, थोडक्यांत - त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांची क्षमता कमी होत नाही ना हे वारंवार तपासणं.
आपल्या आजूबाजूला पण अशी फेरा नसल्याची - खूप उहाहरण दिसतात. अभ्यासाची उजळणी न करणे, रस्ते, इमारती, नदींचे बांध, कालवे यांची वेळेवर दुरूस्ती न करणे, आपण कामात किती मागे पडलो ते तपासून न पहाणे, आपल्या नियमांत कांय दुरूस्त्या करण्याची गरज आहे याचा विचार न करणे, ही सर्व फेरा नसल्याचीच उहाहरणे आहेत.
आपल्याकडे सुमारे दीडशे वर्षांपासून चालत आलेला एक नियम फेरा देउन नव्या युगाच्या दिशेने बदलला तर विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल ते पाहू. आपल्या परीक्षा होतात. त्यासाठी कुणीतरी शिक्षक पेपर सेट करतात. ही एक मोठी डोकेदुखीच असते. म्हणून वर्षाला कसेबसे एकदा पेपर्स सेट केले जातात ते गुप्तपणे छापायचे. ते फुटू नयेत म्हणून खूsssप काळजी घ्यायची. पेपर एकदाच सेट करायला लागावा व एकदाच छापायला लागावा म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकदम घ्यायची. सन् 1850 मधे आपल्या देशांत शाळा आणि परीक्षेची पद्घत लागू झाली तेंव्हापासून हे सगळे नियम चालत आले आहेत. त्याला दीडशे वर्ष लोटली. पूर्वी देशभरात कांही हजार मुलं परीक्षा देत. आता कांही कोटी मुलं परीक्षा देतात. म्हणजे यंत्रणेवर केवढा ताण येत असेल पहा. विद्यार्थ्यांवर तर भयानकच ताण असतो - अगदी आत्महत्येपर्यंत.

पण जरा विचार करा. आता संगणकाचे युग सुरू झाले आहे. संगणकाला आपण खूपसे (म्हणजे समजा पाच सहा हजार ) प्रश्न सांगून ठेवले तर तो त्यांची उलट सुलट जुळणी करून आपल्याला हवी तेंव्हा एक एक प्रश्नपत्रिका तयार करून देऊ शकतो. त्याला फक्त सांगायच - आपल्याला चवथीच्या लायकीचा पेपर हवा की नववीच्या की बारावीचा. तेवढं आपण संगणकाला सांगायच. तसेच भूगोलाचा पेपर हवा की गणिताचा किंवा इतर कुठल्या विषयाचा ते ही सांगायच. अशा त-हेने सोय केली तर दर महिन्याला परीक्षा घेता येतील - आपल्या सोईने कितीही वेळा परीक्षेला बसल तरी चालेल - - आपल्याला अभ्यास झालेला आहे असे पटेल तेंव्हाच. मग शिक्षकांवर जबाबदारी फक्त उत्तरपत्रिका तपासण्याची. तेही एकदम चार-पाच लाख नाही तर थोडे थोडे. अशा त-हेने हवे तेंव्हा जाऊन हव्या त्या विषयांची परीक्षा देऊन टाकता आली तर सगळे भयानक ताण कमी होतील की नाही ? मग आपण आपल पहिली ते बारावी फक्त पुढल्या वर्गात सरकत रहायचं. दरवर्षी मार्च मधेच सगळ्या परीक्षांचा बाऊ वगैरे कांही नाही - हवे तेंव्हा हव्या त्या परीक्षा आटोपून टाकायचा. पहाच विचार करून. आवडेल कां अशी पद्घत ?
--- XXX ---
Following email was later recd. from "raghunath gagil" rdinkar2002@yahoo.co.in
halo leenatai dt-24/01/09
. U are a teacher probably in marathi med school/tuition class etc.
in last 30 yrs a one whole generation has come up, who has learnt in English med. Their parents thought their children would be smarter if sent to convent/ eng med school. Is this proved wrong in todays tech savy world?. I asked head of a eng med school regarding this but no answer was given. U may be knowing better
I have read ur article in todays URJA sup I have this to say
As u pointed out edu system in India is ageold & was d/ned to produce babus.
It gives more * to written part & oral & practicals play secondary role. If I asked a student of 6th std onwards to give me 500 ml of water , what will be his/ her reaction . ? will he use a ½ lit empledgety plastic milk bag to measure? Conclusion is edu system does not give student practical know.
Introduction of compu. Brought out a new form of exam.
In cont. of yr Article u can write on this.ie on line exams .conventional exams are written exams & scoring in many of these depends on yr ability to select proper ( more weightage) QS & attempting them in given time.
In these yr teacher sets a paper that leaks out @ various pts of transfer viz. Teachers, peons,printing press , courier service personnel etc. besides it provides scope for copying & manipulation @ time of checking.finally u get a mrks sht.
Unlike this, on line exams are comp based . all Q papers are stored in comp & student sitting next to u will definetly not get same paper. They are put up on net few minutes before exams & no leakage is likely. Qs are obj type & student is expected to select one of multiple choices.. stud. has to put a tick mrk against correct choice & results are out within 10 minutes. If any of u students has given MSCIT exam u may be knowing this . if ur elder bro has given GRE he may tell u about this wonderful exam sys.
Bye I do hope u write about this
Yrs truly
rdinkar .

मंगलवार, 13 जनवरी 2009

चाउ आणी माउ हे दोघे दोघे भाऊ

चाउ आणी माउ हे दोघे दोघे भाऊ ।
खात होते खाऊ गोड गोड ।।
चाउ आणी माउ खात असताना खाऊ
तिकडून आला काऊ काळा काळा ।।
काऊ म्हणाला चाउ, तुम्ही काय रे करता भाउ।
चाउ म्हणाला खाउ, खातो आम्ही ।।
काऊ म्हणाला चाउ, तुम्ही दोघे दोघे भाउ ।
द्या ना मला खाउ, थोडा तरी ।।
अपूर्ण